यावल,(प्रतिनीधी): तालुक्यातील दगडी व मनवेल येथील शेतमजुर महिलांनी शेतमजूरी रोजंदारीत वाढ करून मिळण्यासाठी गेल्या रविवार (ता.६)पासून कामावर बहिष्कार टाकून आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलनास कोणत्याही राजकीय, सामाजीक, महिला संघटनांचे सहकार्य न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव शेतमजूर महिलांनी आपले आंदोलन मागे घेत महिला आजपासून कामावर हजर झाल्या आहेत.
वाढत्या महागाई मुळे शंभर रुपये रोज याप्रमाणे मिळणारी शेत मजुरी महिलांना परवडत नसल्यामुळे गेल्या तीन दिवसापासुन दगडी व मनवेल येथील शेतमजूर महिलांनी शेत कामावर बहिष्कार टाकुन घरीच राहून आंदोलन सुरू केले होते. तसेच मनवेल ग्रामपंचायत कार्यलयावर धडक मोर्चा काढुन सरपंच जयसिंग सोनवणे यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली होती.
सरपंच जयसिंग सोनवणे यांनी गावातील महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी बसस्थांनक जवळील महर्षि वाल्मिक बसस्थांनक जवळ शेतकऱ्यांनी हजर राहुन समस्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता.मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फीरविल्यामुळे तोडगा निघाला नाही. याउलट स्थानीय शेतकऱ्यांनी साकळी येथील शेतमजूर महिलांना बोलावून शेतातील कामे सुरु करून घेतली होती.
साकळी येथील महिला गावात कामावर येत असल्यामुळे स्थानीय शेतमजूर महिलांचा रोजगार आंदोलनामुळे बुडत असल्यामुळे मजुरीत वाढ करण्याचा तोडगा निघू शकला नाही.