जळगाव जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका जळगावच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा निवडणुक आयोगाने काल घोषीत केली. एक महिना आधी ही घोषणा केल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ होते आहे. निवडणुक होणार असल्याने सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. येत्या 4 जुलैते 11 जूलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.12 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर 17 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेवू शकतात. दि. 18 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत म्हणचे 13 दिवस उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी राहील. 1 ऑगस्टला मतदान होऊन 3 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. मनपा निवडणुक घोषित होताच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या. खान्देश विकास आघाडी, शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार का? याकडे जळगाव शहरवासियांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी खान्देश विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे शिवाजीनगर मधील निवासस्थान हे प्रमुख केंद्र बनले आहे. गेल्या आठ दिवसांपासून खाविआतर्फे उमेदवारी अर्जाची विक्री सुरु केली होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज घेणार्यांमध्ये मोठी गर्दी असल्याचे समजते. भाजपतर्फे सुद्धा महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात जय्यत तयारी सुरु झाली आहे. 50 प्लस हे भाजपाचे मिशन असल्याचे भाजपा महानगरप्रमुख आ. राजुमामा भोळे यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. तसेच भाजप -सेना यांच्यातील युतीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जाईल. युती जरी झाली तरी महापौर हा भाजपाचाच राहील, असे आ. राजुमामा भोळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खाविआ भाजप, सेना युती होते किंवा नाही याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. युती झाली तर जागा वाटपाचा तिढा कशा पद्धतीने सुटतोय किंवा जागावाटप कोणत्या आधारावर केले जाते हे तितकेच महत्वाचे असून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचेकडून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी थोपविण्यासाठी राजकीय नेतृत्वाची कस लागणार आहे.
जळगाव नगरपालिका असताना आणि त्यानंतर महानगरपालिका झाल्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नेतृत्वाखाली सत्ता आहे. त्यांचे कालावधीत जळगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाचा देशपातळीवर चर्चाही झाली. मनपा मालकीची 17 मजली इमारत महानगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारुन उत्पन्नात टाकलेली भर, लोकसहभागातून उभारलेले दोन आंतरराष्ट्रीय उद्यान, झोपडपट्टीमुक्त जळगाव शहर त्यांनी केलेला संकल्प वाघूरची पाणी पुरवठा योजना सामाजिक संस्थांना मनपाच्या मोकळ्या जागा देऊन त्याचा केलेला विकास, लोकसहभागातून स्मशानभूमिचा केलेला विकास नगरपालिकांच्या शाळा खाजगी व सामाजिक संस्थांना चालवायला देऊन शहरातील गरीब विद्यार्थ्यांना स्वस्तात चांगले शिक्षण मिळण्याची सोय आदीसारखे त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत. त्यामुळे 32 वर्षे जळगाव शहरात त्यांची सत्ता अबाधित राहिली त्यांना शह देवून त्यांचेकडून सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचेकडून झाला. पण त्यांना ते शक्य झाले नाही, हे विशेष!
महाराष्ट्रात आणि देशात भाजपची सत्ता आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप अशी घोषणा भाजपने केली आहे. परंतु भाजपत काँग्रेसपेक्षाही जास्त गटबाजी असल्याने शतप्रतिशत भाजपची घोषणा कितपत अंमलात येईल याची सर्वांनाच शंका आहे. तसेच राज्यात भाजपा- सेना युती असल्याने जळगाव महानगरपालिकेत होणार्या निवडणुकीत भाजपा- सेनेची युती व्हावी, असे म्हणणारे भाजप आणि सेनेत काही नेते आहेत. त्यात विशेषत: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुरेशदादा जैन यांचे असलेले मैत्रीचे संबंधांमुळे भाजप-सेना युतीला मुर्तस्वरुप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप- सेनेची युती झाली तर त्यांचे विरोधात प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे निवडणुक लढवतील
महानगरपालिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यामुळे भाजप- सेना युती झाली तर एकतर्फी निवडणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच शहर विकासाची हमी मिळणार असेल तर जळगाव महानगरपालिकेची निवडणुक बिनविरोध करु शकतो, असे विधान करुन सुरेशदादांनी सर्वच राजकीय पक्षांसमोर गुगली टाकली आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून सुरेशदादांच्या विधानावर निर्णय घेतल्यास निवडणुकीवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचू शकतो आणि हे वाटते तेवढे सोपे नाही. सर्व पक्षांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणे शक्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच समविचारी पक्ष एकत्र येवून भाजप- सेनेविरोधात लढा देण्याच्या तयारीत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात युतीच्या हालचाली सुरु आहेत त्याला मूर्तस्वरुप केव्हा येते हे कळायला मार्ग नाही.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post