भोपाळ : मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची आज होणारी बहुमत चाचणी टळल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने ४८ तासांमध्ये बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह २२ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर बहुमत चाचणीचे संकट ओढवले आहे. राज्यपालांनी आज सोमवारी कमलनाथ सरकारला तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोना व्हायरसचं कारण केलं पुढे करत राज्यपालांनी विधानसभेचं 26 मार्चपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारची आज होणारी बहुमत चाचणी तूर्तास टळली आहे.
दरम्यान, यानंतर मध्य प्रदेशातील भाजप आमदारांनी आज राजभवनात गव्हर्नर लालजी टंडन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी अशी विनंती केली. यावेळी शिवराज सिंह म्हणाले, सरकारने बहुमत गमावले आहे आणि त्यांना सत्तेवर राहण्याचा कसलाही अधिकार नाही. शिवराजसिंह चौहान यांनी दाखल केलेली ही याचिका मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्या विरोधातील आहे. प्रजापती यांनी करोना विषाणूचे कारण देत विधानसभा २६ मार्च पर्यंत स्थगित केली आहे. यावर भाजप आमदारांनी गदारोळही केला.