भुसावळ ;-रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी व टपरी धारकांचे अतिक्रमण हटविण्यापूर्वी त्यांना पर्यायी जागा व ७/१२ मिळण्यासाठी झोपडपट्टी बचाव समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या लॉंगमार्च पूर्वीच प्रशासनाने मागणीच्या पाठपुराव्याचे पत्र समिती व आंदोलनाला सादर केल्याने तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया मागील ८ महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र संबंधित झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची व पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण न काढण्याची मागणी झोपडपट्टी बचाव समितीतर्फे करण्यात आले. तसेच पर्यायी जागा मिळण्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधी व प्रशासनातर्फे अद्यापपर्यं शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आलेला नसल्याने मागणीच्या पूर्ततेसाठी दि.२ जून रोजी सकाळी ११ वाजता झोपडपट्टी बचाव समितीतर्फे रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व पीआरपीचे जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लॉंगमार्च, जेलभरो, महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र लॉंगमार्च पूर्वीच प्रशासनाने प्रांत प्रशासनामार्फत निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन झोपडपट्टी बचाव समितीला लेखी पत्र सादर केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.या नंतर दि.२ जून रोजी सकाळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने समितीने आंदोलन स्थगित केले. यावेळी नगरसेविका पुजा राजू सूर्यवंशी, पुष्पा जगन सोनवणे ,रिपाई गवई गट जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुन्ना सोनवणे, सुदाम सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, रिपाईचे शरद सोनवणे, बरकत अली, हरिष सुरवाडे, पीआरपीचे बबलु सिद्दीकी,संतोष मेश्राम, मुस्लिम धर्मगुरु अजीम खान, राजू तायडे, राजु लाहोरिया, रवींद्र साळवे, किशोर वानखेडे, आनंद सूर्यवंशी, राकेश बग्गन यांच्या सह झोपडपट्ी बचाव समिती, झोपडी व टपरीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.