मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषदेच्या तपासाचं प्रकरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकार लवकरच एसआयटीची स्थापना करणार आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादीचे नेते व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर प्रामुख्यानं खल झाल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एएनआयला या संदर्भात माहिती दिली. ‘राज्य सरकार या प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहे. त्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच याबाबत निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी स्थापन करतील. एसआयटी स्थापन करण्यासंदर्भात शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिलं होतं. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भात समांतर एसआयटी स्थापन करु शकतं, एनआयएच्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.