भारत मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता होणार; भारूडखेडा पाझर तलाव भूमीपूजनप्रसंगी ना.महाजनांचे प्रतिपादन
जामनेर: – देशाला नरेंद्र मोदींच्या रूपाने एक कणखर व सक्षम पंतप्रधान लाभले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपला देश महासत्ता होणार असून जगाच्या पाठीवर भारताचे नाव सर्वच बाबी मध्ये एक नंबरवर राहील असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा वैदकीय शिक्षणमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले.तालुक्यातील भारूडखेडा येथील पाझर तलावाच्या भूमीपूजन प्रसंगी ना.महाजन बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती निता कमलाकर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जे.के.चव्हाण, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अमित देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बोरसे,सदस्य रमण चौधरी,नवलसिंग पाटील, तहसीलदार नामदेव टिळेकर, रामेश्वर पाटील,शिवाप्पा गोडंबे,भारुडखेड्याच्या सरपंच कविता शेळके,मंगल राजपूत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी वृंदावन कन्स्ट्रक्शनचे संचालक दिग्विजय पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.प्रशांत सांगोर यांनी आपल्या प्रास्ताविकातून या पाझर तलावा विषयी माहिती सांगितली.ना.महाजन पुढे बोलताना म्हणाले की,या पाझर तलावा मुळे भारुडखेडा परिसरातील वीस हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून महिनाभरात याचे काम पूर्ण होईल.तालुक्यातील इंच इंच जमीन ओलिताखाली आणण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.पुढच्या पिढीला बारमाही शेती करण्यासाठी चोवीस तास पाणी उपलब्ध राहणार असून जामनेर तालुका हा सर्व बाजूने सुंदर तालुका बनविण्याचा आपण चंग बांधला असून राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यापासून गेल्या पाच वर्षात कुठेही लोडशेडिंग नाही.ट्रांसफार्मर जळाल्यास लगेच आपण उपलब्ध करून देतो.पूर्वी आंदोलने करूनही ३-४ महिने ट्रान्सफार्मर मिळत नव्हते . शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आपणास दिला.गेल्या पन्नास वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.मराठा समाजाला आरक्षण कोणी देऊ शकले नाही. मराठा समाजासाठी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात यशस्वी मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले.मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले याच बरोबर इतरही ही मोर्चे निघाले या प्रत्येक मोर्चेकऱ्यांच्या प्रश्न आपण मार्गी लावले.पुढील दोन वर्षात प्रत्येकाला हक्काचे घर देणार असून एकही बेघर शिल्लक राहणार नाही.प्रत्येकाने घराघरांमध्ये शौचालय बांधणे ही आज काळाची गरज निर्माण झाली असून शौचालयासाठी शासन बारा हजार रुपये अनुदान उपलब्ध करून देत असून त्याचा लाभ घ्यावा कोणीही उघड्यावर शौचास बसून आरोग्याची खराबी करून घेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.राज्याचा जलसंधारण खात्याचा मंत्री म्हणून काम पाहत असताना या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसून भ्रष्टाचारी म्हणून मी डाग लागू दिला नाही.ज्या सरकारने शेतकऱ्यांच्या,शेतमजुरांच्या, गोरगरिबांच्या व सामान्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे.आणि म्हणून पुढील पाच वर्षात ही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून मी पुन्हा मंत्री म्हणून आपल्यासमोर येईल.आपण पंचवीस वर्षापासून मला आमदार म्हणून निवडून दिले.यावेळेस ही माझा विजय निश्चित आहे.मात्र यावेळी एक लाखाचे मताधिक्य अपेक्षित असल्याचे सांगून ते शेवटी म्हणाले की देशभरात व राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्ष सारखे भुईसपाट झाले.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 40 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे भाकीतही यावेळी ना.महाजन यांनी बोलून दाखविले.