लखनौ : लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान होताच उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथने सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर यांची राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यपालांनी ती शिफारस स्वीकारून त्यांना मंत्रिपदावरून बरखास्त केले. त्यांच्याकडे मागासवर्ग कल्याण आणि दिव्यांग कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद होते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या पक्षाच्या अन्य मंत्रिस्तरीय पदांवरील व्यक्तींच्याही हकालपट्टीची कारवाई केली आहे.
राजभर यांनी लोकसभा निवडणूक काळातच भाजपच्या विरोधात अत्यंत आक्रमक विधाने केली होती. भाजपच्या नेत्यांना चपलेने मारले पाहिजे असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले होते. पण निवडणूका होईपर्यंत भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. दरम्यान आपणच या आधीच मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता, तो त्यांनी आज मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे निवेदन राजभर यांनी केले आहे. राजभर यांनी स्वताच्या पक्षाचे अनेक उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे केले होते व काहीं ठिकाणी त्यांनी कॉंग्रेस तसेच सपा-बसपा आघाडीला पाठिंबा दिला होता. या पक्षाचे विधानसभेत एकूण चार आमदार आहेत.