चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव येथील निसर्ग टेकडी परिसरात सामाजिक वनीकरण विभागाचे तालुका लागवड अधिकारी साळुंके साहेब व अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामपंचायत ब्राम्हणशेवगेे व येथील पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून येत्या पावसाळ्यात दहा हेक्टर पडीक क्षेत्रात वृक्षारोपणाचे नियोजन पुर्ण झाले आहे.
वृक्षारोपणापुर्वी या परिसरात पाणलोट उपचारापैकी सर्वांत महत्त्वाचा उपचार म्हणजे माथ्याकडे सरकारी बर्डीजवळ निसर्ग टेकडी लगत दहा हेक्टर पडीक क्षेत्रावर सलग चर (सि.सि.टी.) व खड्डे खोदकामाचा शुभारंभ करण्यात आला.
पावसाळ्यात या जागेवर जवळपास पंचवीस हजार झाडांचे वृक्षारोपण सामाजिक वनीकरण विभागाचे माध्यमातून होणार आहे. तसेच जलमित्र परिवार चाळीसगाव चे सहकार्याने याठिकाणी निसर्ग बेट देवराईच्या धर्तीवर सहज जलबोधकार उपेंद्र दादा धोंडे यांचे मार्गदर्शनाखाली उभारले जाणार आहे. या परिसरात वन्यजीव, हरणाचा वावर असल्याने या ठिकाणी भविष्यात त्याच्या साठी उपाय योजना करण्यात येणार आहे.
याचाच एक भाग म्हणून या निसर्ग टेकडी परिसरात नुकताच सलग चर व खड्डे खोदकामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी कांतीलाल राठोड,रत्नाकर पाटील, ऍड.शिवाजी बाविस्कर, विष्णू राठोड, संभाजी मोरे, पराग निकम,राजेंद्र देसले, सोमनाथ माळी व शेतकरी बांधव तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अमित पाटील,सुरेश काळे, गायकवाड दादा उपस्थित होते.