अन्न व औषध प्रशासनाची भूमिका ठरतेय बघ्याची
बोदवड (सुनिल बोदडे) :- गेल्या काही दिवसांपासून भेसळयुक्त खाद्य तेल विक्री करणारी टोळी शहरात सक्रिय असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.याबाबत दैनिक ‘लोकशाही’ने रोखठोकपणे बातम्या प्रकाशित करीत नागरिकांच्या जीवाशी खेळत असलेल्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात अन्न व औषध प्रशासन अपयशी ठरले असून या भेसळयुक्त तेल विक्री करणा-यांवर कारवाई केव्हा होईल ?असा सवाल विचारला होता.मात्र शहरात आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने या टोळीकडे अन्न व औषध प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात असून त्यांनी या गंभीर प्रकाराकडे फक्त बघ्याची भुमिका घेतली की काय?असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
शहर तथा संपुर्ण बाजारपेठेत विविध खाद्य तेलाची विक्री होत असून याव्दारे अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने काही व्यापारी मंडळी व त्यांचे पंटर यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ मांडला असून अधिकचा नफा मिळविण्यासाठी या टोळीकडून निकृष्ट दर्जाच्या तेलाची भेसळ करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे शहर तथा तालुक्यात सोयाबीन या प्रकारच्या खाद्य तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे या तेलात भेसळ करणारी टोळी बाहेरगावाहून २०० लिटरने भरलेली कोठी आणून त्यामध्ये २ लिटर,५ लिटर किंवा खुल्या स्वरूपात सरकीयुक्त तसेच निकृष्ट दर्जाच्या तेलाची भेसळ करून अधिक नफा मिळवून आपली आर्थिक स्थिती भक्कम करीत आहेत.मात्र या भेसळयुक्त तेलामुळे नागरिकांना अंगाला खाज सुटणे,अॅलर्जी,पोटाचे विविध आजार,चेहऱ्यावर सुज येणं या सह इतर आजारांची लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आपण खात असलेले खाद्य तेल भेसळयुक्त तर नाही ना? आपण तेलाचे पैसे मोजून स्वत:आजार तर विकत घेत नाहीत ना?याची खात्री करणे नागरिकांनी गरजेचे आहे.
विशेष आजपर्यंत संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने शहर तथा तालुक्यांत करण्यात आली नसल्याने संबंधित भेसळयुक्त तेल विक्री करणारी टोळी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या काही अधिकाऱ्यांची यामध्ये मिलीभगत तर नाही ना?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
एकदंर शहर तथा तालुक्यांत अन्न व औषध प्रशासनाकडून विविध खाद्य तेलाच्या नमुन्यांची तपासणी केल्यास या भेसळयुक्त तेल विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.