मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. राज्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. मागील गेल्या 24 तासांत राज्यात धडकी भरवणारी आकडेवारी समोर आलीय.
राज्यात 23,179 नवीन संसर्गाच्या घटना घडल्या असून यामुळे 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त नागपूर, मुंबई आणि पुण्यात याची नोंद करण्यात आली आहे. 17 मार्चला नागपूर कोरोना लॉकडाउनमध्ये कोरोना संसर्गाच्या 3370 नवीन घटना समोर आल्या असून 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 53,080 लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस देण्यासाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी कोरोना लसीचे 2.20 कोटी डोस केंद्र सरकारकडे मागविले गेले आहेत. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिले असून दर आठवड्याला 20 लाख डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोरोनामधील परिस्थितीविषयी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकही केली. त्यांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि लसीकरण कार्यक्रमास वेग देण्याची मागणी मोदींनी सर्व राज्यांकडून केली आहे.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल 318 रुग्णांची वाढ तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना बाधितांची एकूण संख्या 58 हजार 218, सक्रिय बाधित संख्या 2012 असून एकूण मृत्यूची संख्या 1144 वर पोहोचली आहे.
पुण्यात दिवसभरात 2587 रुग्ण वाढले आहेत तर दिवसभरात 769 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात करोनाबाधीत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून 425 रुग्ण क्रिटिकल आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 223797
नाशिकमध्ये 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 2146 जणांना कोरोनाची लागण तर 9 रुग्ण दगावले आहेत. नाशिक शहरात 1296, नाशिक ग्रामीण 631, मालेगाव मनपा 174, जिल्हा बाह्य 45 रुग्ण समोर आले आहेत.