-परिसरातील रहिवासी नागरिक भयभीत
-खुले आम पत्ते जुगार खेळणे
-दारू पिणे, गांजा ओढत बसणे
-प्रतिबंध केलाच तर मारहाणीची धमकी
-घरावर दारूच्या बाटल्या व दगडफेक करणे
-दगडफेकीत रस्त्यावरील कारची काच फुटली
-किराणा दुकानातील कर्मचार्याचे डोके फुटले
जळगाव (प्रतिनिधी) : बळीराम पेठ परिसरातील साई मंदिरा प्रवेद्वारापासून ते मागील रेल्वेगेटपर्यंतच्या दोन्ही बाजूच्या गल्ल्यांमध्ये टवाळखोर तरूण तरूणींचे वाढत्या अवैध कृत्याचा रहिवाशांना होणारा त्रास थांबावा तसेच या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बळीराम पेठ परिसरातील नागरिकांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांना दिले आहे.
पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून बळीराम पेठ परिसरातील रिकाम्या असलेल्या घरांमधून तसेच निर्मनुष्य गल्ल्यांमधून संध्याकाळी-रात्री आणि आता तर दिवसाढवळ्या टवाळखोर तरूण – तरूणी, दारू, सिगारेट आणि तत्सम नशा करतात. जुगार- पत्ते खेळतात. टोळक्याने गांजा ओढतांना दिसतात.
परिसरातील नागरिकांनी त्यांना हटकले, प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते उलट शिवीगाळ करतात, अरेरावी करून अंगावर धावून येऊन धमकावतात. मारण्याच्या धमक्या देतात. मोबाईल चोरतात. काल तर खुले आम दारू पिऊन दारूच्या बाटल्या बरोबरच दगडफेक केली. त्यात रस्त्यावरील एका कारची काच फुटली. दुकानावर सुद्धा दगडफेक केली. त्यामध्ये एका किराणा दुकानात काम करणार्या माणसाचे डोके फुटले. त्यामुळे या टवाळखोरांमुळे या परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत. तरी या टवाळखोर मुला- मुलींचा बंदोबस्त करावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनावर सर्वश्री अजय मस्कावदकर, उल्हास सोनवणे, मनोहर किचनवेअर प्रशांत जैन, संतोष वाणी, मनोज जैन, शुभम वर्मा, योगेश कुमार, भागचंद कुंदनमल बेदमुथा, विजय राजेंद्र अग्रवाल, महेंद्र हिरालाल जैन, बन्सी जुगबज बीदे, नितीन खंदार, हेमंत लढे, संदिप पाटील, पराग टोणगावकर, अतुल जैन, रा.का. बारसे यांच्या सह्या आहेत.