पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली

0

रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने लोकलचा प्रचंड खोळंबा ; ८ ते १२ जूनपर्यंत मुंबईसह उपनगरांत अतिवृष्टीची शक्यता
मुंबई: -मुंबई, उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह राज्याच्या विविध भागांत आज पहाटे पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत उपनगरे आणि दक्षिण मुंबईत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. सकाळी झालेल्या अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसामुळे दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कलसह सायन, चुनाभट्टी आणि सायन परिसरात गुडघाभर पाणी तुंबले आहे. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. माटुंगा ते कुर्ला दरम्यान रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने लोकलचा प्रचंड खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे ४० मिनिटे आणि पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, ८ ते १२ जूनपर्यंत मुंबईसह उपनगरांत अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत रात्रभर मुलुंड आणि भांडुप परिसरात सर्वाधिक पाऊस पडला. तर अंधेरी, वांद्रे, कांजुरमार्ग आणि पवईमध्येही जोरदार बरसला. ठाणे जिल्ह्यात कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, शहापूर आणि भिवंडी परिसरातही पावसानं दमदार हजेरी लावली. कांजुरमार्ग येथे रुळावर झाड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. विक्रोळी येथे अभियांत्रिकी काम सुरू असल्याने मध्य रेल्वेवरच्या धीम्या लोकल जलदगती मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. शिवाय मध्य रेल्वेने अनेक लोकल्स रद्द केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ४० मिनिटे उशिरानं धावत आहेत. तर पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने पश्चिम रेल्वे आणि हार्बरची वाहतूक १५ ते २० मिनिटे लेट आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.