जन्माष्टमीच्या उत्सवावर काळाचा घाला
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवावर काळाने घाला घातला आहे. मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 27 जण जखमी झाले आहेत.
उत्तर परागना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी अनेक भाविक मंदिरात जमले होते. उत्सव सुरू असतानाच अचानक मंदिराचा भाग कोसळली. भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांनी सैरभर पळण्यास सुरूवात झाली. उपस्थित पोलिसांनी काही भाविकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या सर्व दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेचे शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी ममता यांनी संबधित आधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची तर गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना हजार रूपयांची मदत ममता पश्चिम बंगाल सरकारने जाहीर केली आहे.