अशीही प्रतिक्रिया…

1

मन की बात
दीपक कुळकर्णी

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटनेवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया पडताळून पाहिली असता त्यावर हसावे की रडावे हेच कळले नाही मात्र या प्रतिक्रियेला राजकीय वास आहे हे मात्र निश्चित!

दोन गटामध्ये निर्माण झालेल्या दुहीच्या गरमागरम तव्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यात काँग्रेसचा हात कुणीही पकडणार नाही. स्वातंत्र्यापासून जाती-पातीचे राजकारण करुन खर्च्या सहीसलामत ठेवण्यात काँग्रेसने धन्यता मानली आहे. उशिरा का होईना भारतीयांना परिवर्तनाची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. हातची सत्ता गेल्याने चवताळलेल्या काँग्रेसला मिळेल त्या मुद्याचे राजकारण करण्यात हुशारी वाटत आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे दोन अल्पवयीन मुलांना झालेली मारहाण अतिशय दुर्दैवी अशीच आहे, या घटनेचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. मात्र या प्रकरणातही आता राजकारण होवू लागले आहे. आरोपींच्या नावात केवळ जोशी असा उल्लेख असल्याने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी लागलीच ट्विट करुन संघ, भाजपाला दोषी ठरवित दिवसा-ढवळ्या चांदणे दाखविण्याचे काम केले आहे. सर्वण-दलित असा थेट उल्लेख करीत पप्पूंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर हसावे की रडावे असे झाले. (राहुल गांधी यांना पप्पू ही पदवी विरोधकांनी दिलेली आहे.) एखाद्या प्रकरणाचा सखोल अभ्यास नसला की काय गत होते हे गांधींच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट झाले आहे. वाकडीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन होईलच त्याच दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु असून आरोपींच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र राजकीय पक्ष त्याचे सोयीस्करपणे करीत असलेले राजकारण अधिक गंभीर आहे.
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील विहिरीवर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांना शेतात नग्न अवस्थेत मारहाण करणे हा लाच्छंनास्पद प्रकार असून आरोपींनी गाठलेली खालची पातळी यावरुन स्पष्ट होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रेस नोटमध्ये आरोपींच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख केला. आरोपीला कुठलाही जात-धर्म नसतो हे आपले सविधान सांगत असतांनाही पोलिसांनी त्यांची जात दाखविण्याचे प्रयोजन काय होते हे अद्यापही स्पष्ट झाले नाही मात्र जातीयवादाचा डंका पिटणार्‍या तथाकथितांना मात्र यातून राजकारण करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यांनी त्याचे सोनेही करुन टाकले. संबंधित विहिरीचा मालक ईश्वर जोशी व नोकर प्रल्हाद लोहार यांनी हे कृष्णकृत्य केल्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायलर झाले. ईश्वरचे आडनाव जोशी असल्याने अनेकांच्या पोटात आनंदाचे तरंग उठले. कुणी ब्राह्मणांवर तर कुणी संघ, भाजपावर तोंड सुख घेण्याची संधी सोडली नाही. गेल्या चार दिवसांपासून तर सोशल मिडियावर तथाकथित लोकांनी अतिशय खालच्या पातळीवर जावून टिका-टिपणी करण्यात धन्यता मानली. जोशी-कुळकर्णी हे आडनाव केवळ ब्राह्मनांमध्ये असतात हाच गैरसमज काँग्रेसचे युवराज असलेल्या पप्पूंचा देखील झाला आणि त्यांनी लागलीच आपल्या ट्विटरवरुन सर्वण-दलित असा उल्लेख करीत जातीय तेढ निर्माण करण्याची जुना परंपरा कायम ठेवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या काळात हे प्रकार वाढत असून हे प्रकार थांबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे विधान करीत, आपल्याला इतिहास माफ करणार नाही असे म्हणत राजकारण करण्यावर गांधींनी भर दिला. वाकडीतील जोशी आणि लोहार यांचा संघ वा भाजपाशी काडीचाही संबंध नाही. ते दोघेही शेतकरी कुटुंबातील असून शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र आपली राजकीय पोळी भाजली जाईल आणि आपल्याला त्याचा राजकारणासाठी फायदा होईल याच शुद्ध हेतून राहुल गांधींनी उताविळपणा दाखविला तो हास्यास्पद आहे. मातंग-दलित यांना वर्षानुवर्षे मागास ठेवण्यात काँग्रेसचाच मोठा वाटा आहे. समाजातील मुख्य प्रवाहात हे लोक यावेत यासाठी काँग्रेसने आजपर्यंत कुठलाही कार्यक्रम हाती घेतला नाही. निवडणुका जवळ आल्यात की त्यांना जाती-पातीचे राजकारण आठवते ते करुन आपले उखळ पांढरे करुन घेण्यात ते धन्यता मानत असतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
वाकडी गावात चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. अन्य आरोपींच्या मुसक्या देखील आवळण्यात आल्या आहेत. तेथे जावून अनेक राजकीय पदाधिकार्‍यांनी भेट देत प्रकरण समजून घेतले आहे. हे सारे होत असताना या प्रकरणातील दोषींची हिंमत कशी वाढली याचा शोधही घेणे आवश्यक झाले आहे. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी ती उजेडात आली. पिडितांचे पालक पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची फिरवाफिरव झाली हे होता कामा नये, राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी याचा शोध घेतला असता तर अधिक बरे झाले असते; मात्र नते न होता जाती-पातीचे राजकारण करण्यावर भर दिला जात आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने कुलीही खातरजमा न करता थेट प्रतिक्रिया देणे आणि तीही चुकीच्या पद्धतीने हे समाजासाठी घातक आहे, अशा प्रतिक्रियांमुळे नाहक कुणीतरी बदनाम होत आणि कुणाला तरी राजकारण करण्याची संधी मिळते आणि त्यातून मुळ विषय बाजूला सारला जातो हे वाकडी प्रकरणात होता कामा नये हीच माफक अपेक्षा!

1 Comment
  1. FerneTwero says

    Hello my friend.
    Our employees wrote to you yesterday maybe…
    Can I offer paid advertising on your site?

Leave A Reply

Your email address will not be published.