नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली असतानाच जिल्हा प्रशासनाने अयोध्येमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार अयोध्येमध्ये चारपेक्षा अधिक लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
दिवाळीचा काळ आणि अयोध्ये प्रकरणी येणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 17 नोव्हेंबरला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.अयोध्येतील जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांनी याविषयी माहिती दिली. दिवाळी आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
येत्या 10 डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. अयोध्येमध्ये बेकायदा कृत्येविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार 31 ऑगस्ट रोजीच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. फक्त आता 12 ऑक्टोबरला जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्येमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. बाबरी मशिद 6 डिसेंबरला पाडण्यात आली होती. त्या निमित्तही हे आदेश लागू करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.