धरणगाव, प्रतिनिधी – महाराष्ट्र विद्यापीठ layda-२०१६ कलम१०९ (४) अन्वये दरवर्षी नवीन महाविद्यालय, नवीन विषय, वाढीव तुकड्या, नवीन विद्याशाखा व सटेलाईट सेंटर सुरू करण्यासाठीचे विविध संस्थांचे प्रस्ताव मागविले जातात. हे प्रस्ताव प्रत्येक विद्यापीठाने अधिष्ठाता मंडळाकडून शिफारस करून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषेदेच्या मान्यतेने दि.१ एप्रिल च्या अगोदर शासनाकडे मान्यतेसाठी पाठवायचे असतात व शासन दरवर्षी दि.१५ जूनच्या आधी या प्रस्तावांना मान्यता देते असे प्रस्ताव विद्यापीठाकडे दाखल करण्यात आले असले तरी यावर्षी “कोरोना” मुळे विद्यापीठ प्रशासनही लॉकडाऊन असल्यामुळे या प्रस्तावांची पुढील प्रक्रिया मुदतीत होवू शकणार नाही , त्यामुळे यावर्षी हे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी , त्यासाठी विशेष अधिसूचना काढावी अशी मागणी ईमेल द्वारा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रा.डी.आर.पाटील यांनी केली आहे.
ही मुदत वाढवून दिली तरच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम , नवीन विषय सुरू करता येतील असेही कबचौ उमविचे राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.दिलीप रामू पाटील यांनी मेलमध्ये स्पष्ट केले आहे.

