धानोरा महावितरणच्या दिव्याखाली अंधार!

0

भ्रमणध्वनी, लँडलाईन फोन बंद : कार्यालय रामभरोसे
* नियोजनाचा अभाव

*  कर्मचार्‍यांचा तुटवडा झिरोवर आहे भार

धानोरा, ता. चोपडा दि. 6

 परिसरातील 16 गावांचा भार असलेल्या येथील वीज वितरण कंपनीचा कारभार नियोजन शून्य होत असून कार्यालयात कर्मचारी देखील उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला भ्रमणध्वनी व लँडलाईन फोन देखील दिवसभर बंदावस्थेत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे. काल मंगळवारी रात्री वादळामुळे तब्बल 15 तासांपासून वीज पुरवठा खंडीत झालेला असून कर्मचारी बिघाड शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील लँडलाईन फोन काही कर्मचारी बाजूला ठेवीत असल्याची तक्रार ग्राहक करीत असून कार्यालयात त्याचा प्रत्यय देखील आला. फोन बाजूला ठेवणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

याबाबत असे की, मंगळवारी सायंकाळी वादळ-वार्‍यासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर लागलीच बत्तीगुल झाली. रात्रभर नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. काही नागरिक, लोकप्रतिनिधींनी महाविरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असला कार्यालयातील लँडलाईन व भ्रमणध्वनी दोघेही बंदावस्थेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून येथील भोंगळ कारभाराने खेळ मांडला असून त्यावर कुठलीही उपययोजन केली जात नसल्याने ग्राहकां ना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणतर्फे सर्व कामे करण्यात आली असताना देखील पावसाळ्यात पुन्हा वीजेचा बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार खंडीत होणार्‍या वीजप्रवाहामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कर्मचार्‍यांची अपूर्ण संख्या
परिसरातील 16 गावांचा भार येथील विज वितरण कंपनीवर असताना देखील येथे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नााहीत. कनिष्ठ अभियंत्यासह बहुतांश कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने रात्री-बेरात्री येथील कारभार रामभरोसे असतो. काही कर्मचारी रात्रीच्या वेळी फोन घेण्यास देखील तयार नसल्याने समस्यांमध्ये वाढत होत आहे.
झिरोचा वायरमनचा तोरा
ग्रामीण भागातील विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. काही स्वयंघोषित झिरो वायरमनने या कार्यालयातील ताबा घेतला असून हे झिरो त्यांच्याच तोर्‍यात वावरत असून मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. झिरोंचा वाढता वावर भविष्यात घातक ठरु शकते याकडे महावितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
20 तासांपासून बत्तीगुल
मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वादळ-वार्‍यासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर लागलीच बत्तीगुल झाली. तब्बल 20 तासांपासून ग्रामीण भागातील जनता अंधारात असून प्रशासनाकडून बिघाड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कंपनीतर्फे योग्य नियोजन होत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत.

वादळामुळे वीज प्रवाह खंडीत झाला असून बिघाड शोधण्या चे काम सुरु आहे. वीज खंडीत झाल्यामुळे भ्रमणध्वनी बंद आहे. लँडलाईन फोन सुरु असून तेथे प्रशिक्षणार्थी ऑपरेटर कार्यरत आहे. ग्राहकांचे हाल होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

– कुणाल तडवी, कनिष्ठ अभियंता

वीज पुरवठा बंद असल्यामुळे मोबाईल चार्ज झाला नाही. संपूर्ण तालुक्यात ब्रेक डाऊन आहे. कर्मचारी बिघाड काढत असून वीज पुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. धानोरा येथील दुरावस्थेबद्दल सूचना दिल्या जातील.
व्ही.बी. सोनवणे, अभियंता, चोपडा

Leave A Reply

Your email address will not be published.