जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटना ; सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया ; दोघांना अटक
पहूर ता. जामनेर ;- पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांची धिंड काडून त्यांना पट्टा व काठीने मारहाण केल्याची धोकादायक घटना जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडली असून याघटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केल्यानंतर तो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे . घटना रविवारी घडली असून याप्रकरणी एका मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी दोघांना रात्री पोलिसांनी उशिरा अटक केली आहे . अशी घटना घडल्याने अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वाकडी येथील सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) हे दोन तरुण ईश्वर जोशी यांच्या विहिरीत रविवारी पोहण्यास गेले होते . हि माहिती समजताच ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी त्या तरुणांना नग्न करून त्यांची विवस्त्र धिंड काढली . तसेच दोघांना पट्टा आणि काठीने चोप दिला . याबाबतचे चित्रण मोबाईलवर करून ते सोशल मीडियावर टाकल्याने घटना बुधवारी उघडकीस आली . याप्रकरणी दुर्गाबाई सांडू चांदणे यांनी बुधवारी रात्री पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ईश्वर जोशी व प्रल्हाद लोहार यांना पोलिसांनी अटक केली आहे . तपास पोलीस करीत आहे .
काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या वाकडीत
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी येथे दोन लहान मुलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा काँग्रेसतर्फे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी निषेध केला असून गृहमंत्रालय हे गुन्ह्यांवर वचक ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, शिवाय पीडित मुलांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाचे काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या वाकडी येथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात अशी घटना घडणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.
वाकडी येथे किरकोळ कारणावरून मातंग समाजाच्या दोन मुलांना नग्न करून मारहाण करण्यात आल्याची घटना वाकडी येथे उघडकीस आली आहे. या मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात अशी घटना घडणे हे अतिशय निंदनीय असून या घटनेतील आरोपींंना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी माजी खासदार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केली आहे. या घटनेचा निषेध नोंदवित, राज्याचे गृहखाते हे गुन्हेगारी दूर करण्यास सपशेल अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात अशा घटनांचे प्रमाण वाढले असून हे गृहमंत्र्यांचे मोठे अपयश असून अशा घटनांना आळा घालता येत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही डॉ. उल्हास पाटील यांनी म्हटले आहे. वाकडी येथील घटना अत्यंत निंदनीय असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी,डॉ. राजू वाघमारे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी आमदार अब्दुल सत्तार,डी.जी पाटील, अँड. ललीता पाटील, डॉ. राधे-शाम चौधरी,यांच्या सह आदींस काँग्रेसेचे शिष्टमंडळ उद्या 15 जून रोजी वाकडी येथे या मुलांच्या कुटंबियांची भेट घेणार आहे.