इंदापूर : पोटासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन धडपडणार्या ऊसतोड मजुरांवर काळाने घाला घातला आहे. बारामती इंदापूर राज्य महामार्गांवर भरधाव ट्रकने 4 बैलगाड्यांना जोरात धडक दिल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे बैलगाड्या महामार्गावरून खाली फेकल्या गेल्या. या अपघातात भाऊराव उत्तम कांबळे या ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे निघाल्या होत्या. बेलवाडी जवळ पोहोचले असता एका भरधाव ट्रक चालकाने चार बैलगाड्यांना जोराची धडक दिली. यामध्ये एका ऊसतोड मजूर जागीच ठार झाला. तर एक बैलही मृत्युमुखी पडला आहे. तर चार बैल जखमी झाले आहेत.
महामार्गावरील बेलवाडी ओढ्यावरील पुलावर हा अपघात झाला असून अतिशय वेदनादायी घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.