आठ दिवसात मुलभुत सुविधा देणार असल्याचे संस्थाचालकांचे आश्र्वासन
पाचोरा (प्रतिनिधी) : बांबरूड खुर्द (महादेवाचे) ता.पाचोरा येथील माध्यमिक विद्यालय या शाळेत कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाहीत. वारंवार शिक्षक बदलणे, शिक्षकांचे वर्गातच धूम्रपान करणे, पिण्याची पाण्याची दुर्दशा, घाणमिश्रित नित्कृष्ठ दर्जाचा शालेय पोषण आहार, शौचालयाची पुरेशी सोय नसणे, प्रयोगशाळा व ग्रंथालय नसणे आदी असुविधांना कंटाळून विद्यार्थ्यांनी व पालकांनी व गावकऱ्यांनीच चक्क गावात दवंडी देत शाळेवर गेल्या दोन दिवसांपासून बहिष्कार घालत विद्यार्थ्यांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला असून ही दुर्दैवी घटना पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द (महादेवाचे) या गावी घडली होती.
याबाबत दैनिक लोकशाही व इतर दैनिकांनी दि. २१ रोजी बातमी प्रसारीत केल्यानंतर मुख्याध्यापक योगेश बाविस्कर यांनी या सर्व असुविधेबद्दल शाळा व्यवस्थापणाला सुचना केल्या असून आठ दिवसात सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी माहिती दिली. दरम्यान शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. अशी आशा पालकांनी व्यक्त केली होती. तर शाळेचे चेअरमन स्वतः येऊन समस्यांची सोडवणूक करत नाहीत तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नसल्याची भूमिका पालकांनी व गावकऱ्यांनी घेतली होती. दि. २२ रोजी गटशिक्षणधिकारी व संस्थाचालक यांनी पालकांची बैठक घेउन केलेल्या तक्रारींचे लवकरच निराकरण करण्यात येईल असे अश्वासित करून पुन्हा शाळा सुरळळीत सुरू करण्यासाठी पालकांचे मनपरिवर्तन केल्याने शाळा सुरू झाली. दरम्यान दि. २२ रोजी संस्थाचालक भैयासाहेब पुंडलिक पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, केंद्रप्रमुख दिलीप शिरसाठ हे गावात दाखल होवुन त्यांनी पालकांना बोलावून बैठक घेतली असता पालकांच्या सूचना तक्रारींची दखल घेत संस्थाचालक भैय्यासाहेब पाटील यांनी तातडीने पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू केले. तर येत्या आठ दिवसात शाळेला कॉम्पुटर चे ५ संच , प्रयोग शाळा साहित्य, वाचनालयाचे साहित्य, आणून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देऊन यापुढे कोणत्याही प्रकारे शाळेचे व विद्यर्थ्यांचे नुकसान होणार नाही असे आश्वासन दिले. तर गट शिक्षणाधिकार्यानी सांगितले की विना अनुदानित शाळा असल्याने अडचणी येतात मात्र मूलभूत सुविधा पुरविण्याच्या संस्थेला सूचना केल्या. पालकांचे समाधान झाल्याने शाळा दि. २२ दुपारसत्रा पासूनच भरविण्याचे ठरले. आठ दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या आश्वासनानंतर शाळेचे कामकाज सुरू करण्यात येत असल्याचे व सहकार्य करण्याचे पालकांनी गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांना सांगितले.