नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या संख्येत रुग्णवाढ नोंद होत आहे. यामुळे चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान सोमवारी देशात गेल्या २४ तासात ४६ हजार ९५१ रुग्णांची नोंद झाली आहे. ७ नोव्हेंबरनंतरची ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १६ लाख ४६ हजार ८१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान भारतात गेल्या २४ तासात २१२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून २१ हजार १८० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत उपचारानंतर बरं झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी ११ लाख इतकी आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजार ९७ इतकी आहे. सध्या देशात ३ लाख ३४ हजार ६४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ४ कोटी ५० लाख ६५ हजार ९९८ इतकी आहे.
गेल्या वर्षभरापासून जगातील अनेक देश कोरोना महामासाथीचा सामना करत आहेत. अनेक देशात लाॅकडाऊनसारख्या पर्यायाचा सातत्याने अवलंब करावा लागत आहे. भारतासह बहुतेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे पण तरी धोका कायम आहे. कारण काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही दुसरी लाट अधिकच भयंकर असल्याचं स्पष्ट होत आहे.