नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्विटमधून मोदींनी मणिपूरमधले लेईसांग गाव वीज पोहोचलेले देशातील शेवटचे गाव असल्याची म्हटले आहे. मे 2018 मध्ये ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आले त्यावेळी देशातील 18 हजार 452 गावांमध्ये वीज नव्हती. त्यावेळी मोदी सरकारने दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना जाहीर केली होती. याच योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार देशातील 1236 गावे अशी आहेत, जिथे कुणीही राहात नसूनही त्याठिकाणी वीज पोहोचली आहे. तर चराईसाठी आरक्षित असणाऱ्या 35 गावांचाही यात समावेश आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर आता सर्वच स्तरातून शंका उपस्थित केली जात आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार गावातील 10 टक्के घरे, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वीज पोहोचली असेल तर ते गाव इलेक्ट्रिफाईड झाले असे मानण्यात येते. मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण गावात वीज आली. त्यामुळे 100 टक्के गावांमध्ये वीज पोहोचली असली तरीही देशात पूर्णपणे वीजजोडणी झाली असे म्हणता येणार नाही. पंतप्रधान मोदींच्या दाव्यानंतरही देशातील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. त्यामुळेच सरकारने मार्च 2019 पर्यंत चार कोटी ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांना वीज पुरवण्याची योजना बनवत आहे.