मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रात्रीपासून भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर भीम अनुयायींची गर्दी पाहायला मिळत आहे. मनमाड शहरातही जयंतीला जल्लोषात सुरुवात झाली. मध्यरात्री डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अवघा निळा सागर लोटला होता. रात्री १२ ठोक्याला भीम अनुयायांनी ढोल ताश्यांच्या गजरात मध्यवर्ती डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ जमत लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या.