मुंबई | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल असून रोज 25 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. नागपूर मुंबई पुणे अमरावती अशी मोठी शहर कोरोनाच्या विळख्यात सापडली असून आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारले असता त्यांनी देखील लॉकडाउनचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
अशावेळी रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलंय.
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबाबतच्या नियमांचं पालन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी असे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार सध्या लवकरात लवकर लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. आम्ही राज्यात दररोज जवळपास ३ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत. या हिशोबानं आम्ही एका आठवड्यात २०-२१ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.