मुंबई : महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. उद्या २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं असून आम्ही ३० तास काय ३० मिनिटांतही बहुमत सिद्ध करु शकतो असा दावा केला आहे.
महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे. विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावं असंही न्यायालयाने सांगितलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, “या देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होतं. न्यायालयाच्या निकालानं ते खरं ठरलं आहे. सत्याचा विजय झाला आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “आमचे सगळे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहेत. या देशात अजूनही सत्य पराभूत होत नाही. आम्ही ३० तास काय ३० मिनिटांतही बहुमत सिद्ध करु शकतो,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.