जळगाव: देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाजू केले त्यामुळे २०-२५ आमदार कमी झाले. फडणवीस यांनी आम्हाला बाजूला सारले नसते तर आज ही जी वेळ आली आहे ती आली नसती, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.
महिन्याभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन झाले. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. मला, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या निष्ठावंताना दूर केले. त्यामुळेच भाजपवर आज ही वेळ आली आहे या शब्दात खडसे यांनी टीका केली. भाजप ज्यांच्या विरुद्ध लढून जिंकली. त्यांच्याच सोबत सरकार बनविण्याचा प्रकार चुकीचा होता. मी राहिलो असतो, तर किमान २५ जागा वाढल्या असत्या. ज्यांनी एवढा मोठा सिंचन घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत सरकार बनविण्यापेक्षा कारवाई अपेक्षित होती. परंतू कदाचित सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले असतील, असेही खडसे म्हणाले.