जळगाव :- पावसाळ्यापूर्व शहरात नालेसफाई अत्यावश्यक आहे. जेणेकरुन नालेसफाईअभावी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होवू नये. मात्र मनपा प्रशासनाकडून सदोष नालेसफाई होत असल्याने हा उद्देश सफल होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.
जुन्या गावात लेंडी नाला सफाईचे काम सुरु असून मनपा कर्मचारी, अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे जेसीबी व पोकलॅण्ड चालक नाल्यातील गाळ हा किनार्यावरच टाकत आहेत. पाऊस सुरू झाल्यावर किनार्यावरील गाळ परत नाल्यात जावून पुन्हा जैसे थे होवून पूरपरिस्थितीची शक्यता आहे. गाळ ट्रॅक्टरद्वारा इतरत्र टाकावा, अशी मागणी नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
तर जुन्या गावात पूरपरिस्थिती ?
मनपाकडून जुन्या गावातील चौगुले प्लॉट, भैय्याची वखार, कुंभार समाज मंदीर, ममुराबाद नाका परिसरातील लेंडी नाल्याचा गाळ काढण्याचे काम सुरु आहे. मात्र गाळ हा नाल्याच्या दोन्ही बाजूच्या किनार्यावर टाकला जात आहे. पावसाच्या पाण्याने तो पुन्हा नाल्यात जावून या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. यापूर्वीही परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नाला व्यवस्थित साफ न होता पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मक्तेदाराचे बिल अदायगी झाल्यास पाणी घरात घुसून होणार्या नुकसानीची जबाबदारी मनपा अधिकारी, कर्मचारी यांची राहील, तरी स्वत: प्रत्यक्ष येवून पाहणी करावी व नालेसफाईबाबत अधिकार्यांना सूचना करावी, अशी मागणी नगरसेवक किशोर बावीस्कर यांनी केली आहे.