केवळ तीन आगारांमध्ये संप ; शासनाकडून तातडीने उपाययोजना
जळगाव ः एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यभरात पुकारलेल्या या बंदला महामंडळाच्या जळगाव विभागातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत 845 फेऱ्यांपैकी 394 फेऱ्या सुटल्या असून, 511 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दरम्यान संपकाळात जनतेची गैरसोय होवू नये, प्रवाशांचे हाल होवू नयेत यासाठी एसटी, परिवहन, पोलिस व महसूल प्रशासन या सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवण्याच्या व 24 तास सज्ज राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज घेतलेल्या उपाययोजनासंदर्भात बैठकीत दिल्या. या बैठकीस पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे इ. अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 4849 कोटी रूपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. परंतू, मान्यताप्राप्त कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) या संघटनांतर्फे संप पुकारण्यात आला आहे. मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात केली. या संपात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक मिळून विभागातून तीन ते साडेतीन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रवाशांना संपाबाबत कल्पना नसल्याने बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसफेऱ्या बंद झाल्याने ताटकळत बसावे लागले होते.
–———केवळ तीन आगारांमध्ये संप —-
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस.टी.च्या सेवेवरील परिणामाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये एस.टी.च्या एकूण 11 आगारांचा समावेश असून त्याद्वारे दररोज सुमारे साडेतीन लाख प्रवाशांची वाहतूक महामंडळामार्फत करण्यात येते. त्यापैकी केवळ 3 आगारामध्ये संपामुळे वाहतूक बंद असून जळगाव, मुक्ताईनगर व अमळनेर आगारामध्ये वाहतूक सुरळीत आहे. उर्वरित 7 आगारामध्ये वाहतूक अंशत: सुरु असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली.
———तीन आगारात पुर्ण बंद ———–
जळगाव विभागातंर्गत येणाऱ्या रावेर, जामनेर आणि चोपडा या आगारांमधून सकाळपासून एक देखील फेरी सोडण्यात आली नाही. मात्र, सकाळी नऊ वाजेनंतर अमळनेर, पाचोरा, भुसावळ, चाळीसगाव, मुक्ताईनगर या आगारांमधील फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. जळगाव आगारातील फेऱ्यांवर बंदचा परिणाम झाला नाही.
एस. टी. कर्मचार्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
भुसावळ ;- राज्यातील एस. टी कर्मचार्यांनी शुक्रवार 8 रोजी मध्यरात्री पासून पगार वाढीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्रवाशांचे चांगालेच हाल होतांना दिसून आले. अचानक झालेल्या संपामुळे खाजगी वाहतूकदारांची चांगलीच चांदी झाली असल्याचे दिसून आले. एकतर्फी केलेल्या वेतन वाढीस एस. टी. कामगार संघटनेचा विरोध आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पासून कर्मचार्यांनी पगार वाढीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले. या संपामुळे तब्बल चार लाखाचा फटका आगाराला बसल्याचे आगारप्रमुख हरीष भोई यांनी सांगितले. पहाटे चार वाजेच्या सुमारास भुसावळ आगाराची भुसावळ -धुळे ही बस जळगावपर्यंत गेली मात्र त्यानंतर एक ही बस गेली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.