नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दरम्यान, करोनाचा वाढत प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या म्हणजे रविवारी २२ मार्चला १४ तासांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. पंतप्रधानांनी या कालावधीत जनतेनं घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं. आता यासोबतच रेल्वेनंही २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं यासंबंधी परिपत्रकही काढलं आहे. तर दुसरीकडे इंडिगो, गोएअर या विमान कंपन्यांनी १ हजार उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये पॅसेंजरसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही समावेश आहे. आज मध्य रात्रीपासून आणि उद्या रात्री १० वाजेपर्यंत एकही पॅसेंजर ट्रेन धावणार नाही. यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या सुमारे २४०० फेऱ्या रद्द होणार आहेत. तर मेल आणि एक्स्प्रेसच्या सुमारे १३०० फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबादमधील उपनगरीय लोकल गाड्यांच्या सेवेत मोठ्या संख्येत कपात केली गेलीय. यामुळे कमीत कमी लोकल धावणार आहेत.
विमानांची १ हजार उड्डाणं रद्द
इंडिगो आणि गोएअरने जनता कर्फ्यूला पाठिंबा दिलाय. गोएअरने उद्याची सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. तर इंडिगोनची फक्त ४० टक्के उड्डाण होणार आहेत. दोन्ही कंपन्यांच्या निर्णयाने रविवारी १ हजार उड्डाणं रद्द होण्याचा अंदाज आहे. रद्द केलेल्या उड्डाणांच्या तिकीटांचे पैसे परत करण्याबाबत एकाही कंपनीने आश्वासन दिलेले नाही.