चोपडा : तालुक्यात कोरोनाने महिन्याभरापासून थैमान घातले आहे. त्यावर उतारा म्हणून प्रशासनाने पुन्हा चार दिवसांनी जनता कर्फ्युत वाढ केली आहे.याचा परिणाम कोरोनाचा वाढत्या रुग्ण संख्येला पायबंद घालतांना दिसत आहे.कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने दि २०,२१ या दोन दिवसांचा जनता कर्फ्यु लावला होता.
परंतु विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन जनता कर्फ्युत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर २२,२३,२४ मार्च पर्यंत कर्फ्युत वाढ करण्यात आली.याचा चांगला परिणाम कोरोना रुग्ण संख्येत घट होण्यात दिसून आला. पण एवढ्यावर न थांबता प्रशासनाकडून कोरोनाची मगर मिठी सोडविण्यासाठी पुन्हा चार दिवसाचा पुन्हा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे.यात दि २५ व २६ रोजी किराणा दुकानांसाठी शिथिलता देण्यात आली आहे.
गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चोपड्या इतकी भयावह कोरोनाची स्थिती कुठेही दिसून आली नाही. अक्षरशः कुटुंबाचे कुटुंब कोरोनाच्या मगर मिठीत अडकले.तालुक्यातील घराघरात कोरोनाचा एक तरी रुग्ण आढळून आला. चोपड्यातील सर्व हॉस्पिटल फुल्ल झाले.रुग्णसंख्या एवढ्या झपाट्याने वाढत गेली की,प्रशासनाला देखील कळत नव्हते की काय उपाययोजना कराव्यात.परंतु प्रशासनाच्या वतीने आकडे वाढले तरी चालेल पण टेस्टिंगवर भर देण्यात आला.त्यामुळे आकडे देखील वाढले.त्यासोबत जनता कर्फ्यु लावण्यात आला.त्यात वेळोवेळी वाढ करण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम कोरोना रुग्ण संख्या वाढीच्या टक्केवारीत घट होतांना दिसून येत आहे.याचा अर्थ कोरोनाचे संकट कमी झाले असा नसून परंतु नागरिकांची मानसिकता मात्र कोरोनाबाबत पॉझिटिव्ह झाली आहे हे मात्र निश्चित.
चार दिवसांच्या कर्फ्युत दोन दिवस किराणा दुकानांसाठी शिथिलता
चोपडा प्रशासनाकडून २५ ते २८ मार्च पर्यंत पुन्हा जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. परंतु यात २५ व २६ या दोन दिवसांसाठी किराणा दुकानांना शिथिलता देण्यात आली असून सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे तर भाजीपाला व फळे विक्रेत्यांना घरपोच सेवेसाठी परवानगी दिली आहे. तसेच दूध,मेडिकल ,वैद्यकीय सेवा यासाठी मुभा देण्यात आली आहे.