आश्वासनानंतर उपोषण मागे
बोदवड : तालुक्यातील चिखली बु येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत भष्ट्राचार झाल्याचा आरोप येथील ग्रा.पं.सदस्य लालसिंग पंडित पाटील यांनी करीत वारंवार तक्रारी करूनही योग्य ती कारवाई न झाल्याने त्यांनी चिखली बु येथील ग्रामपंचायत कार्यालयाला समोर आमरण उपोषण सुरू केले होते.
तालुक्यातील चिखली बु येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत भष्ट्राचार झाला असून संबंधितांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाच्या निधीचा गैरवापर केला आहे.त्याचं बरोबर शासनाकडे सादर केलेले बिले बनावट असून लेखा परीक्षण सुध्दा चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे.सदर योजनेच्या पाईप लाईनचे खोदकाम जेसीबी साहाय्याने केले असतांनाही संबंधितांनी त्यावर मजुर दाखवून त्यांचे मस्टर काढून निधीत अपहार केला असून बोअरवेल नसतांनाही बोअरवेल दाखवून खोटे बिले सादर केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या सुरू असलेल्या उपोषणाची दखल बोदवड पंचायत समिती गटविकास अधिकारी आर.ओं.वाघ यांनी घेत उपोषणकर्ते लालसिंग पाटील यांनी भेट देऊन संबंधित योजनेची चौकशी त्रयस्थ उप विभागामार्फत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते श्री.पाटील यांनी आपले सुरू असलेले उपोषण मागे घेतले.यावेळी गटविकास अधिकारी श्री.वाघ यांनी त्यांना लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता केली.
तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत भष्ट्राचार झाल्याच्या चर्चा तालुक्यात असून जबाबदार अधिका-यांनी निःपक्ष व सखोलपणे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या दफ्तराची व योजनेची सखोल चौकशी केल्यास भविष्य तालुक्यातील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेतील झालेला अपहार व योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस येईल यात शंका नाही.