चाळीसगावात ९३२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील वसुंधरा फाऊंडेशनच्या ‘दान पर्व’ उपक्रमाअंतर्गत शहर व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सील, दप्तर अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
वसुंधरा फाऊंडेशन ‘दान पर्व’ या उपक्रमाद्वारे दान संस्कृतीची जपवणुक करुन गरजवंत विद्यार्थ्यांना, व्यक्तींना मदत करण्यात प्रयत्न करते. दरवर्षी वही दान, जुने स्वेटर-कपडे दान, दिवाळीला फराळ दान असे दान जमा करुन गरीब व गरजवंत व्यक्तींपर्यंत ती मदत पोहचविण्याचे कार्य करीत असते.
‘वही दान पर्व २०१८’ यावर्षीही वसुंधरा फाऊंडेशनतर्फे १ मे ते १५ जून दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला होता. सोशल मिडीया, वर्तमान पत्रातून आवाहनाद्वारे तसेच जनजागृतीसाठी माहिती पत्रकाद्वारे नागरीकांना १ वही, १ पेन-पेन्सिल दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या काळात शहरातील १२ ठिकाणी सदर साहित्य संकलन करण्यात आले.
समाजातील अनेक व्यक्तींनी उपक्रमाला प्रतिसाद देवून सहभाग घेतला. अनेक डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, शिक्षक, शाळा, राजकीय व्यक्ती, संस्था आणि वसुंधरा मित्र परिवार अश्या सर्वांच्या माध्यमातून सुमारे ६०३० वही ६७२ पेन-पेन्सिल तसेच दप्तर असे शैक्षणिक साहित्य संकलीत करण्यात आले.
चाळीसगाव शहरातील व तालुक्यातील अनेक शाळांकडून गरजवंत विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली. प्राप्त यादीनुसार शहरातील आदर्श प्राथमिक विद्यालय, नालंदा विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, नगरपालिका शाळा क्र. १, ४, ७, १६, न. पा. उर्दू शाळा क्र. १, २, ३, ४, सुमनताई झाल्टे प्राथमिक विद्यालय, हरणाताई जोशी प्राथमिक विद्यालय, कळंत्री प्राथमिक विद्यालय, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, आ. बं. मुलांचे व मुलींचे हायस्कूल, सानेगुरुजी प्राथमिक विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, राष्ट्रीय विद्यालय, राष्ट्रीय कन्याशाळा, विवेकानंद विद्यालय, तहजीब उर्दू स्कूल, प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय, सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय, एच. एच. पटेल प्राथमिक विद्यालय, व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालय, काकासोा. पूर्णपात्रे अभिनव विद्यालय, कै. चंदीराम के. बजाज शाळा, हरिभाऊ चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा (लोणजे), जि. प. प्रा. शाळा (जुनोने), माध्यमिक विद्यालय (बहाळ), प्राथमिक आश्रमशाळा (तळोंदे प्र. चा.) अशा एकूण ३४ शाळा तसेच याव्यतिरीक्त अनेक गरीब व गजवंत विद्यार्थ्यांना संकलीत केलेले शैक्षणिक साहित्य प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद यांच्या हस्ते व उपस्थितीत वाटप करण्यात आले.
ह्यावर्षी सुध्दा वसुंधरा फाऊंडेशनच्या ‘दानपर्व’ उपक्रमाला चाळीसगाव वासियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दातृत्वाच्या बाबतीत चाळीसगावकर नेहमीच अग्रेसर असतात आणि यांचा परिचय पुन्हा दान पर्वाच्या निमित्ताने झाला.
कुण्या एका व्यक्तीकडून दान न घेता प्रत्येक व्यक्तीची मदत व सहकार्य घेऊन हा उपक्रम राबविला गेला. वसुंधरा फाऊंडेशनतर्फे सर्व दातृत्वाचे तसेच शिक्षक वृंदांचे त्यांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करण्यात येत आहे.
—————————-

Leave A Reply

Your email address will not be published.