गाव शिवारातील वने वाचली तरच पाणलोट जिवंत राहतील

0

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यशाळेत उप वनसंरक्षक पगार यांचे प्रतिपादन

जळगाव ;- भविष्यातील ही शेती पाण्याच्या काटेकोर वापरासह मातीच्याही संधारणेतून अधिक समृद्ध होईल. आजची स्थिती लक्षात घेता जलसंधारणे सोबतच मृदसंधारणेवरही अधिक भर द्यावा लागेल आणि याची सुरवात वनांच्या रक्षणातून करावी लागेल. जी गावे लोकसहभागातुन ‘माथा ते पायथा’ याप्रमाणे जलसंधारण आणि मृदसंधारणाची कामे करतील तीच गावे भविष्यात टिकतील असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे विभागीय उप वन संरक्षक डी. डब्ल्यु पगार यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनने हाती घेतलेल्या ‘बा-बापू 150’ ग्रामविकास प्रकल्पांतर्गत ‘लोकसहभागातून पाणलोट विकास व जलसंधारण’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जैन हिल्स येथील सुबीर बोस सभागृहात झालेल्या कार्यशाळेत जिल्हा कृषि उपसंचालक अनिल भोकरे, पाणलोट विकासाचे तज्ज्ञ प्रशिक्षक भटु रंगराव पाटील, ममुराबाद कृषि विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ व्ही. बी. पाटील, कांदा करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विनोद रापतवार उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतीहार घालुन कार्यशाळेची सुरवात झाली. कार्यशाळेत जळगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा या तालुक्यांमधील 33 गावांचे सरपंच, उपसरपंच, प्रतिनिधी, शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

श्री. पगारे पुढे म्हणाले की, जलसंधारणाच्या कामात गावाच्या विकासाची, सामाजिक वनीकरणाची परिभाषा महत्त्वाची असुन प्रत्येकाने आपल्या गावाचे शिवार ओळखले पाहीजे. पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने त्यांचे पुनर्भरण करण्याची जबाबदारी शासनासमवेत जागृत लोकसहभागातुनही झाली पाहिजे. माथ्यावरील जंगल वाचले तरच पायथ्यावरील पाणलोट जिवंत राहील. वने जिवंत ठेवण्यासाठी शासनासोबत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
जलसंधारणासाठी मनसंधारण होणे आवश्यक- अनिल भोकरे
लोकसहभागातून पाणलोट विकासाची चळवळ उभारायची असेल तर जलसंधारणासाठी प्रत्येकाचे मनसंधारण होणे अपेक्षित आहे. जैन हिल्स येथील या कार्यशाळेतुन मनसंधारणाचाही व्यापक संदेश सहभागी 130 प्रतिनिधींच्या मार्फत गावागावत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. पाणी, मातीशिवाय शेतीत समृध्दी येणार नाही यासाठी बांध बंदिस्ती करायला हवे, या समवेत पिकांचे नियोजनही योग्य पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे जिल्हा कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

भारताच्या विकासाचा परिघ शेती, शेतकरी, ग्रामस्थ, माती, पाण्याशिवाय पुर्ण होणार नाही हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जाणले होते म्हणून त्यांनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. गांधी रिसर्च फाऊंडेशन व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतलेल्या ‘बा-बापू 150’ ग्राम विकास प्रकल्पा अंतर्गत लोकसहभागातुन गावाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजची ही पाणलोट विकास कार्यशाळा त्याच्याच एक भाग असल्याचे प्रतिपादन विनोद रापतवार यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

लोकसहभागातुन पाणलोट विकास यावर भटु पाटील यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या काळातील शेती व उच्च कृषि तंत्रज्ञान यावर व्ही. बी. पाटील यांनी, मसाला पिकांची लागवड व उत्पादन याविषयी गौतम देसर्डा यांनी तर पाणलोट क्षेत्र संकल्पना यावर डॉ. वैभव सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), सेंद्रीय शेती, उच्च कृषि तंत्रज्ञान, मृदसंधारण, नेतृत्व व संवाद कौशल्ये, लोकसहभागातुन ग्रामविकासाचा आराखडा या विषयांवर कार्यशाळेत विचारमंथन करण्यात आले. निवडक सरपंचांनी अशा प्रकारची कार्यशाळा आमच्या गावातही शेतकरी व ग्रामस्थांसाठी आयोजीत करावी, अशी मागणी केली. सूत्रसंचालन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.