विधानपरिषदेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांची घोषणा
मुंबई : महाराष्ट्र दिनी १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली.
दरम्यान, लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुरक्षेचे नियम पाळले न गेल्यामुळे झालेल्या या हल्ल्याला पोलीस उपअधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.या नक्षलवादी हल्ला प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल सरकारला प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं केसरकर यांनी सांगितलं. हल्ल्यानंतर या पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्या विरोधात भावना तीव्र होत्या. शहीद पोलिसांच्या पत्नीने देखील शैलेश काळे यांच्या विरोधात तक्रार केली होती. म्हणून पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचं निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली. यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काळे यांचं निलंबन करण्याबाबत घोषणा केली.