जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक उद्या १८ मार्चला पार पडणार आहे. त्या आधीच भाजपच्या नगरसेविका सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण हे बेपत्ता झाल्याची घटना आज समोर आली आहे. याबाबत पती बाळासाहेब चव्हाण यांनी आज रामानंदनगर पोलीस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.
महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदावरून अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. उद्या ऑनलाईन सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार असल्यामुळे अज्ञात ठिकाणी राहून सुध्दा मतदान करता येणार असल्याने दोन्ही बाजूंनी ही काळजी घेतली आहे.आधीच भाजपचे ३० नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहे. यात आता भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण या काही नगरसेविकांसोबत दिनांक १४ मार्च रोजी रात्री नाशिक येथे रवाना झाल्या. यानंतर १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता एका नगरसेविकेच्या मोबाईलवरून त्यांनी आपल्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क साधला. यानंतर त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला नसल्यामुळे रामानंदनगर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत फिर्यादी बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण रामानंदनगर पोलीस स्थानकात मिसींगची फिर्याद दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच आता ते नाशिकच्या दिशेने निघाले असून पारोळ्यापर्यंत पोहचले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.