जळगाव (रजनीकांत पाटील) : उन्हाळ्यात शीतपेयांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गतवर्षी झालेले नुकसान यदा भरून निघेल या आशेने या क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचा मोठा फटका शीतपेय विक्री व्यवसायाला बसत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातील बाजारपेठेत, बसस्थानक परिसरात फेब्रुवारी महिन्यापासून ज्युसबार, शीतपेय व्यवसाय, रसवंतीची दुकाने थाटू लागतात. उन्हाळ्याच्या चार महिन्यात वर्षभराचे उत्पन्नाचे नियोजन शीतपेय व्यावसायिक करून ठेवतात. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बस स्थानक, स्टेशन रोड, फुले मार्केट परिसर, पालिका परिसर आदी भागांत शीतपेयांची दुकाने सुरू झाली.
स्थानिक व्यावसायिकांसह परराज्यातील आईस्क्रीम, लस्सी विक्रेत्यांनीही आपली दुकाने थाटली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शीतपेयाच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत नागरिक थंडपेय दुकानांमध्ये गर्दी करत असतात. मात्र शहरात सध्या या दुकानाकडे कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.