नवी दिल्ली – देशात कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. बुधवारी देशात 59 हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले. 17 अक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा आकडा असल्याचे समजते. गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर एवढ्या वेगाने पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे पाहता, वॅक्सिनेशन सुरू असतानाही संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक सिद्ध होऊ शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत संक्रमित रुग्ण संख्या अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. पंजाबचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. येथेही संक्रमितांची संख्या आधीच्या लाटेची सीमारेषा पार करण्यापर्यंत पोहोचली आहे.
25 मार्चपर्यंतच्या आकडेवारीप्रमाणे, एका आठवड्यात भारतात रोज सरासरी 47 हजार 442 नवे रुग्ण समोर येत आहेत. 28 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच सात दिवसातील सरासरी एवढी अधिक झाली आहे. मात्र, कोरोना प्रसाराचा विचार केला, तर आकडे अणखी भयभीत करणारे आहेत. सात दिवसांपूर्वी, देशातील कोरोना रुग्णांची सात दिवसांतील सरासरी 28 हजार 551 एवढी होती. याचाच अर्थ नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत केवळ एका आठवड्यातच 66 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या मे महिन्याशी आताच्या स्थितीची तुलना केल्यास मे महिन्यात रोज तीन हजार पाचशे नवे रुग्ण समोर येत होते. मात्र, आता हा आकडा वाढून 47 हजारवर पोहोचला आहे. याचा अर्थ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमणाचा वेग अनेक पटींनी वाढला आहे.
कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या अखेरीस शिखर गाठेल –
आकडेवारीचा विचार करता, कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात शिखर गाठेल. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालाचा विचार करता, देशात दुसरी लाट एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च पातळीवर असेल. 15 फेब्रुवारीला सुरु झालेली ही लाट 100 दिवस चालेल.
अहवालात कोरोनाच्या पहिल्या लाटेतील आकडेवारीसंदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि तामिळनाडूचे प्रदर्शन सर्वात खराब होते. तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमध्ये रोजच्या रोज विक्रमी कोरोना रुग्ण समोर येत आहेत.