केंद्रीय पाहणी समितीने तालुक्यातील तीन गावे वगळली !

0

– खेडगांव (नंदिचे) येथे सात मिनिटात दौरा आटोपला

पाचोरा (प्रतिनीधी) : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी डॉ सुभाष चंद्रा यांचे नेतृत्वात केंद्रीय पथक पाचोरा तालुक्यातील,सामनेर, खेडगांव नंदिचे, गोराळखेडा खुर्द व बांबरुड महादेवाचे या चार गावात पहाणी करणार होते, मात्र पथकाने सामनेर,गोराडखेडा, व बांबरुड महादेवाचे येथील पाहणी दौरा अचानक रद्द करुन फक्त पाचोरा – जळगांव हायवे वरील खेडगाव (नंदिचे) येथील कांताबाई तेजमल संघवी यांच्या मेनरोड वरील गट नं. १८१/२ (अ) या शेतातील खराब झालेल्या मका आणि कापसाच्या पिकाची पाहणी केवळ सात मिनिटात आटोपून भडगाव तालुक्याकडे प्रयाण केले. त्यांचे सोबत श्री. दिनानाथ, विभागीय आयुक्त दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सुनिल वानखेडे, जिल्हा अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, जिल्हा संपर्क अधिकारी दिपक ठाकुर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात केंद्रीय पाहणी समितीच्या दौऱ्यास सकाळी ९:४५ वाजता सामनेर येथुन सुरुवात होणार होती. केंद्रीय समिती येणार असल्याने सामनेर येथे सकाळी ८:३० वाजेपासुनच १५ ते २० शेतकरी बस स्थानका जवळ वाट पाहत होते. सामनेर येथे सकाळी ९ वाजता उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी हजेरी लावुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मात्र केंद्रीय समिती गावाहुन जात असतांना ही पाहणी करणार नसल्याने शेतकरी निराश होऊन माघारी फिरले. केंद्रीय समिती खेडगांव (नंदिचे) येथील संघवी यांचे शेतात १०:४८ ते १०:५५ अशी केवळ सात मिनिटे मका व मक्याचा खराब झालेला चारा व कापसाच्या पिकाची पाहणी केली. पाहणी पथकाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांचेकडे  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक पंढरीनाथ पाटील, शेतकरी बाबुशेठ संघवी, सुनिल संघवी, सरपंच ज्योती सोनवणे, पोलिस पाटील उमा चंद्रशेखर पाटील, अशोक पाटील, संजय पाटील यांनी माहिती दिली. यावेळी सुधाकर सुस्ते पाटील, तालुका कृषी अधिकारी अशोक जाधव, मंडळ अधिकारी ए.एन. घोंगळे, चेतन बागुल, वरद वाडेकर, रमेश मोरे, तलाठी अनिता सुतार, किर्ती चौधरी, प्रकाश डाहाके, गणेश गायकवाड, ग्रामसेवक एस. आर. पाटील सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समिती प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांनी मक्याचे पिक पाऊस येण्या अगोदर कापले होते का ?, पाऊस किती दिवस चालला ?, कापसाच्या किती वेचण्या झाल्या ?, ज्वारी – बाजरी पिकांचेही नुकसान झाले का ?, रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कोणते पिक घेतले जाते ? या बाबत माहिती जाणून घेतली.

केंद्रीय समितीस तालुका काँग्रेसकडुन निवेदन
केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र महाजन, शहर अध्यक्ष अॅड. अहमद पठाण, प्रकाश चव्हाण यांनी दुष्काळ भरपाई बाबत निवेदन देवुन परतीच्या पावसामुळे कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकांचे तालुक्यात १५० टक्के पाऊस झाल्याने पुर्णतः पिके वाया गेल्याने शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. यामुळे कोरडवाहू पिकासाठी २५ हजार व फळबाग पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्याची शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.