केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी !

0

जळगाव तालुक्यातील शिरसोली, पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी, भडगाव तालुक्यातील भोरटेक तर चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द शिवारात शेतकऱ्यांशी साधला संवाद

चाळीसगाव : गेल्या महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘क्यार’ या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात बाधित झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्च विभागाचे सल्लागार श्री. दीना नाथ  यांचे पथक आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज सकाळी जळगाव तालुक्यातील शिरसोली, पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी, भडगाव तालुक्यातील भोरटेक तर चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी या पथकासमवेत नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जळगावच्या उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, पाचाऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे, पाचोराचे गणेश मरकड, चाळीसगावचे अमोल मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. ठाकूर तसेच संबंधित तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी शिरसोली येथील शेतकरी दशरथ बारी यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापूस पीकाची, खेडगाव नंदी, ता. पाचोरा येथील शेतकरी कांताबाई तेजमल संघवी यांच्या नुकसान झालेल्या मका पीकाची, भोरटेक, ता भडगाव येथील शेतकरी हिंमतराव त्र्यंबकराव शितोळे यांच्या तूर व ज्वारी पीकाची, तर हिगोणे खु., ता. चाळीसगाव येथील शेतकरी अरविंद भीमराव पाटील यांच्या  शेतातील ज्वारी पीकाची पाहणी केली.

यावेळी डॉ. सुभाष चंद्र यांनी सांगितले, की पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. तसेच त्यांनी पाहणी केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पथकातील अधिकाऱ्यांना माहिती देतांना शेतकऱ्यांनी सांगितले की, ऐन पीक काढणीच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्याचबरोबर अद्यापही काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम घेण्यातही अडचण येत आहे. कपाशीच्या आतापर्यंत तीनवेळा वेचणी झाली असती, परंतु पावसामुळे वेचणीतर नाहीच पण उभ्या पीकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याची विनंती केली. यावेळी महसूल, कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच भेट दिलेल्या ठिकाणी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील पीकाचे खरीप व रब्बी हंगामाचे क्षेत्र, पीक परिस्थिती, लागवड केलेले क्षेत्र, बाधित क्षेत्र, पाऊसाची सरासरी तसेच पीक काढणीच्यावेळीच पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस, केळी, लिंबूबागा, ऊस या पीकांचे जिल्ह्यातील  6 लाख 41 हजार 345 शेतकऱ्यांचे 7 लाख 18 हजार 12 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून नुकसानीच्या भरपाईसाठी सन 2019-20 मध्ये 812 कोटी 29 लाख रुपयांची आवश्यकता असून शासनाकडून 179 कोटी 98 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून अद्याप 622 कोटी 22 लाख रुपये मदतीची आवश्यकता असल्याचेही सादरीकरणात सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.