कसोटी : बांगलादेशला पहिल्या डाव १०६ धावांत गुंडाळला !

0

कोलकाता: कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर भारत आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळत आहे. दरम्यान, पहिल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारताने बांगलादेशला पहिल्या डावांत १०६ धावांत गुंडाळले आहे. ३०.३ षटकांत बांगलादेशचा संपूर्ण संघ माघारी परतला. भारताकडून सर्व दहा बळी वेगवान गोलंदाजांनी टिपले. इशांत शर्माने २२ धावांत ५ बळी घेतले तर उमेश यादवने २ आणि मोहम्मद शमीने २ बळी टिपले.

आज सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रमुख उपस्थिती राहिली. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र, भारतीय गोलंदाजीपुढे पुन्हा एकदा बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. भारताच्या वेगवान माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. पाहुण्या संघाचे ४ फलंदाज तर आपलं खातंही न उघडता माघारी परतले. बांगलादेशचा संघ ३०.३ षटकांत अवघ्या १०६ धावा करून माघारी परतला. यातील २९.३ षटके वेगवान गोलंदाजांनी टाकली तर फक्त एक षटक फिरकीपटू रविंद्र जाडेजाने टाकले.

Leave A Reply

Your email address will not be published.