जळगाव (रजनीकांत पाटील) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विवाह सोहळे, अंत्यसंस्कार, दशक्रिया विधींसह गर्दी होणारे लहान-मोठे समारंभ अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. दंडात्मक कारवाई सुरू आहे. प्रशासकीय दक्षतेच्या

पार्श्वभूमीवर एसटी बसमधून सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे परिवहन महामंडळाने बससेवा दीर्घकाळ बंद ठेवली. नंतर अनेक नियमांना अनुसरून बस सुरू झाल्या. एका सीट वर एक प्रवासी, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर आदी बाबींकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. मात्र, हळूहळू सर्वच घटकांमध्ये कोरोनाविषयक बेफीकरी आली.
त्याला परिवहन महामंडळही अपवाद नाही. सध्या तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक सुरू असून, प्राथमिक नियमांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
गाडीत कोरोना नाही का?
बसमध्ये ज्यांना कोरोनाच्या गांभीर्याची कल्पना आहे, असेच प्रवासी मास्क लावून बसलेले आढळतात. उर्वरित मात्र कोरोना नष्ट झाल्याच्या आविर्भावात किंवा जिवावर उदार झालेले दिसून येतात.
काही जण वाहकाने तंबी दिल्यावर तोंडाला रूमाल बांधतात. मात्र, नंतर काढून ठेवतात. अतिरिक्त प्रवासी भरल्यामुळे अनेकदा दोन प्रवाशांची क्षमता असलेल्या आसनावर तीन जण बसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे
फिजिकल डिस्टन्सच्या नियमाला पुरता हरताळ फासला जात आहे. खच्चून भरलेल्या बसमध्ये कोरोनाचा एक रुग्ण असेल, तर किती जण संसर्गित होऊ शकतील याचा विचार होणे आवश्यक आहे.

