मुंबई : काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार येणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान हा शपथविधी रोखण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने मात्र याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीविरोधात ही याचिका केली होती. याचिकेत त्यांनी निवडणूकपूर्व युती तोडून नव्या आघाडीचं सरकार बनवणं ही मतदारांची फसवणूक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून रोखावं अशी मागणी करण्यात आली होती.