मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील सरकारविरोधात आक्रमक झालेल्या आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांवर टीका करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज्य सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या अर्णव गोस्वामींविरुद्ध शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णबवर सभागृहाकडून कारवाई होऊ शकते.
‘अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी’ अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.
‘अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत’ अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात अस घटना म्हणते. अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?’ असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज (8 सप्टेंबर) दुसरा आणि अखेरचा दिवस. विधानपरिषद उपसभापती पदाची निवडणूक आज अपेक्षित असली तरी भाजपने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्याकडे डोळे लागले आहेत.