अमळनेर :- राज्यासह जिल्ह्यात तीव्र दुष्काळ निर्माण झाला असून या दुष्काळात पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी शासन विविध उपाययोजना करत असून उपाययोजना जनतेपर्यंत प्रभावीरित्या पोहचण्यासाठी सर्व कार्यकर्ते विशेष प्रयत्न करणार आहेत. त्यादृष्टीकोणातून आ.स्मिताताई वाघ या संपूर्ण अमळनेर मतदार संघात दुष्काळी दौरा करणार आहेत.
राज्यातील 151 तालुके, 268 महसुली मंडळे व 931 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारी यंत्रणेने दुष्काळग्रस्त शेतकरी व गावकरी यांना दिलासा देण्यासाठी काम सुरू केले आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, रोजगार हमीच्या कामाच्या निकषात सूट, पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर्सचा वापर व शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची जोडणी खंडीत न करणे, हे आठ उपाय सरकारने दुष्काळग्रस्त भागात लागू केले आहेत. दुष्काळाविषयी घेतलेले निर्णय, टॅकरद्वारे पाणी पुरवठ्याबाबत घेण्यात येणारी काळजी, चारा छावण्यांची व्यवस्था, दुष्काळग्रस्त भागातील लोकांना रेशनद्वारे धान्य मिळण्याबाबत केलेली व्यवस्था इत्यादीबाबत सरकारने वेळोवेळी अनेक शासन निर्णय जारी केले आहेत. सरकारच्या कामाला पक्ष संघटनेतर्फे साथ देण्यासाठी आणि सरकारी उपाययोजना जनतेपर्यंत प्रभावीरित्या पोहचण्यासाठी सर्व कार्यकर्ते विशेष प्रयत्न करणार आहेत.त्यादृष्टीकोणातून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ डॉ संजय कुटे यानीं दुष्काळी दौरा करण्याबाबत सूचना आमदार व खासदारांना केल्या आहेत. आ.स्मिता वाघ या सदर दौऱ्यातर्गत दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा देणे,सरकारने केलेल्या कामाची माहिती देणे आणि दुष्काळग्रस्तांच्या समस्या सरकारपर्यंत पोहचविणार आहेत. आमदार निधीतून कशा प्रकारे मदत करता येईल याची माहिती घेणे, आदीचा यात समावेश आहे. याबाबतचा संपूर्ण अहवाल प्रदेश कार्यालयास सादर करणार असल्याचे आ.वाघ यांनी म्हटले आहे.