पाचोरा (प्रतिनिधी) : संपूर्ण जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असुन त्यात गावातही दररोज रुग्ण आढळत आहेत. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून लोकही कोरोना संसर्गाकडे फारसे गांभीर्यपूर्वक पाहत नसावेत असे रोजच्या गर्दीवरून दिसते.
जिल्हाधिकारी जळगांव यांनी कडक निर्बंध लादले असून व्यापारी, दुकानदार, हातगाडी फेरीवाले, भाजीपाला यांच्यावर सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत निर्बंध कडक केले असतांना तशी परिस्थिती दिसत नाही. जसे बैलगाडी हाकणारा गाडीवाला जोपर्यंत बैलाला आर टोचून बैलाला जोरात चालण्याची जाणीव करून देत नाही तोपर्यंत तो पळत नाही तशी परिस्थिती गावातील बहुतांश व्यावसाहिकांबद्दल दिसून येत आहे. कित्येक व्यावसाहिक सात वाजेनंतर पोलीस गाडी येण्याची किव्हा पोलीस येण्याची वाट बघतात व नंतरच आपल्या व्यवसायाचे शटर बंद करतात. तरी आतून रात्री ८-९ वाजेपर्यंत व्यवसाय सुरूच ठेवतात अशी परिस्थिती मेन रोडसह गल्लीबोळात बघायला मिळते.
गेल्यावर्षी कोरोना काळात गावात फवारणी, सॅनिटायझेशन, नियमित केल्यामुळं गावात कोरोना आटोक्यात आणण्यास मदत झाली होती परंतु आतादेखील ग्रा. प. कडून फवारणी, सॅनिटायझेशन करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच मास्क चा वापर न करणाऱ्यांवर देखील कार्यवाही व्हावी. त्यासाठी ग्रामस्थांचे देखील सहकार्य ग्रामपंचायत, पोलीस, महसूल प्रशासनास मिळायला हवे.