मुंबई- काही दिवसांपासून उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या चार दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म्हणजेच 6 किंवा 7 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर पावसाला सुरुवात होईल. जवळपास 5 दिवस केरळ किनारपट्टीवर स्थिरावल्यानंतर 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा केरळात मान्सून उशिराने दाखल होत आहे. पश्चिम किनाऱ्यावर मान्सूनच्या वारे दाखल होत आहेत. त्यामुळे केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसातच महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान यंदा मान्सून सरासरीच्या 96 टक्के पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात मान्सून पूर्व पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. नागपूरमध्ये शनिवारी काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर धुळे, नगर, नाशिक, शिर्डी या ठिकाणी आज मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकरी वर्ग आणि उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक काही प्रमाणात सुखावले आहेत.