नवी दिल्ली: भविष्यात भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकव्याप्त काश्मीर(Pok) या एकमेव मुद्द्यावर बातचीत करेल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राजनाथ सिंह बोलत होते.
त्यांनी म्हटले की, काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. त्यामुळे ते संपूर्ण जगासमोर रडगाणे गात आहेत. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना भीक घातली नाही, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
कलम ३७० हे काश्मीरच्या विकासात अडथळा बनू पाहत होते. त्यामुळे ते हटवण्यात आले. मात्र सध्या शेजारील ही भारताने केलेली चूक आहे असे सांगत आंतराराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावीत आहे. मात्र पाकिस्तानशी संवाद झाला तर तो फक्त त्यांनी दहशतवादी संघटनांना बळ न देण्याच्या मुद्द्यावर होईल. पण आता तो संवाद PoK प्रश्नावरही होणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.