नवी दिल्ली :- अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद मध्यस्थांच्या मार्फत सोडवायचा की अन्य माध्यमातून याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवला. सोबतच, पक्षकारांनी ‘मध्यस्थ’ किंवा ‘मध्यस्थ समिती’साठी व्यक्तींची लवकरात लवकर नावं सुचवावीत, आम्ही याबद्दल लवकरच निर्णय घेणार आहोत, असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांच्या पाच सदस्यीय पीठासमोर आज सुनावणी पार पडली.
आज सुनावणीला सुरुवात होताच हिंदू महासभेच्या वकिलांनी या प्रकरणात मध्यस्थ नेमण्यास विरोध दर्शवला. अयोध्येचा प्रश्न हा धार्मिक भावनांशी जोडलेला आहे, असे वकिलांनी सांगितले. न्या. बोबडे यांनी सांगितले की, आम्हाला देखील जनभावना माहित आहे. हा धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे. आम्ही लोकांच्या मनाचा, भावनांचा विचार करत जखमा भरुन काढण्याच्या मार्गाचा विचार करत आहोत, आम्हाला देखील या वादावर लवकरात लवकर तोडगा काढायचा आहे, असे बोबडे यांनी स्पष्ट केले.
सुनावणी दरम्यान मध्यस्थीसाठी सर्वांच्या सहमतीची गरज नाही, असा युक्तिवाद एका मुस्लिम पक्षकाराने उपस्थिती केला. त्यावर, हा दोन व्यक्तींमधला नव्हे तर दोन समाजांशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे कोणावरही कसलीही सक्ती करता येणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केलं. मात्र, मध्यस्थीने काही होणार नाही असे म्हणणे हे देखील चुकीचे असून बाबराने काय केले आणि त्यानंतर काय झाले याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ नेमण्यासंदर्भातील निकाल राखून ठेवला.