मुंबई : राज्यतील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निर्णय दिला असून राज्यात उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना काँग्रेसने त्यांच्या गटनेत्याची निवड केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीच या पदावर निवड झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्या नावाची घोषणा केली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायनं दिलेल्या निर्णयानंतर मुंबईतील जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यात गटनेते पदासाठी थोरात यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला एकमतानं मंजुरी देण्यात आली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हेही यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदान नाही तर लाईव्ह टेलिकास्ट करा, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.