मार्चपासून योजना सुरू होणार
नागपूर : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर विधीमंडळाचे पहिले अधिवेशन सुरू असून आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्ज माफ करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मार्चपासून योजना सुरू होणार असेही ते म्हणाले.
दरम्यान, अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे, असा सवाल ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी केंद्राने मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबादारी घेऊन मदत करेल, असंही सांगितलं.मुंबई महापालिकेच्या ठेवी या मुंबईकरांच्या हक्काच्या आहेत. केंद्र सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी. असेही ते म्हणाले. गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार, असेही ते म्हणाले
मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, “मंत्रालय मुंबईत आहे त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो. हा हेलपाटे मारावे लागू नये म्हणून आमचं सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करेल. जिल्ह्याची कामं त्या त्या विभागात होतील, हेलपाटे वाचतील.”